बुधवार, ११ मे, २०१६

पूर्वतयारी -३

                                                          

                   
                       परदेशी जायचे म्हटले कि पूर्वतयारी फार महत्वाची . अहो !कुठेही जा पूर्वतयारीशिवाय जाणे काही योग्य नाही . पासपोर्ट तर आलेले होते पण तिकडे जयायचे म्हणजे " व्हिसा" नावाचे एक महत्वाचे प्रकरण आहे . आम्ही TRAVEL MASTERS (MUMBAI) PV - branch pune यांचे मार्फत व्हिसाचे कागदपत्रे देण्याचे ठरवले . त्यासाठी  बँक अकौंटची सर्व माहिती , तुम्ही काही एफ डी वगैरे केले असेल तर त्याचे सविस्तर माहिती , घराचा ७/१२ , जमिनीचा ७/१२ , आई डी प्रूफ , हे सर्व आवशक असते आम्ही सर्व कागदपत्रे जमा केली अर्थात आपल्याकडे कोणत्याही कार्यालयात इतक्या सहज काहीच मिळत नसते , तो अनुभव मलाही आला पण ! ते सर्व कागदपत्रे मिळविली  आणि मला तर गड जिंकल्यासारखे झाले . सर्व कागदपत्रांचे स्क्यानिंग करून एजंटकडे ई मेलने पाठवली आणि त्यांनी Australian Government,  Department of Immigration and Border Protection यांच्याकडे पाठवली ती नेमकी डिसेंबर २०१४ मध्ये सदर केली होती आणि तो महिना नेमका नाताळचा असल्यामुळे आमच्या पथ्यावर पडले , कारण त्यांच्याकडे नाताळ अगदी राष्ट्रीय सण असल्यासारखा असतो त्यामुळे लवकरच व्हिसा मंजूर झाला . २४ डिसेंबर २०१४ ते २४ डिसेंबर २०१६ पर्यंत आम्हाला दोन वर्षाचा व्हिसा मंजूर करण्यात आला . 
                   आमची तर तयारी झाली अगदी मी माझ्या मित्र मंडळीला पण सांगितले कि आम्ही आता लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत . परंतु नेमके काही अडचणी उभ्या राहिल्या " श्रेयांसि बहु विघ्नानि " आणि आमचे ऑस्ट्रेलियाला जाणे लांबले. मन फार खिन्न झाले पण नाईलाज होता . वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही हेच खरे . मनात असेही वाटले कि आपले काही जाणे होत नाही . पण गणेश म्हणायचा  " अण्णा तुम्हाला यावेच  लागेल , तुम्ही तसे काही वाटून देवू नका " मनात इतके ठरवूनही जर ठरवलेले घडले नाही तर फार मनस्ताप होतो . आणि वाट पाहणे हे तर फार त्रासदायक . जवळ जवळ ७-८ महिने असेच गेले आणि गणेशाचा फोन आला तो म्हणाला ," आण्णा ! मी तुमचे टिकेट बुकिंगसाठी एजंटला सांगितले आहे . आता तुम्ही तयारीला लागा …… " मग मात्र पुन्हा हुरूप आला पण यावेळी ठरवले कि प्रत्यक्ष विमानतळावर गेल्याशिवाय कोणालाही काही बोलायचे नाही . आमचे तिकीट सुद्धा कन्फर्म झाले .२६ ऑक्टोंबर २०१५ ते रिटर्न ७जानेवारी २०१६ . मुंबई ते सिंगापूर जेट एअरने व तेथून पुढे quantas एअरलाईनने मेलबोर्न पर्यंत असा एकदंदर १४तासांचा प्रवास . या दोन विमान कंपनीचा करार असल्यामुळे असा हा ब्रेक जर्नी . तिकिटे ऑन लाईन मिळाली . आता खरी आमची लगबग सुरु झाली . 
                  परेदशी राहायचे म्हटल्यावर त्याप्रमाणे कपडे घेणे आले अगदी ३/४ , टी शर्ट , सुटकेस औषधे , नेहमी लागणारे पदार्थ अर्थात कुठल्याही प्रकारचे " बीज " असलेले पदार्थ तिकडे नेता येत नाहीत , बुटाची माती सुद्धा साफ केलेली असावी लागते laptop , व्हिडीओ क्यामेरा , मोबईल काही मिठाई व खाण्याचे पदार्थ असे सगळे यादीप्रमाणे झाले . प्रत्येकी २७ किलो वजन सुटकेसमध्ये अलाउड (मंजूर) होते laptop ची ब्याग आणि पर्स त्या वजनात धरीत नाही हे तुम्हाला जवळ ठेवता येते . बाकी मोठी सुटकेस त्यांच्या ताब्यात असते ती विमानात लगेजमध्ये सुरक्षित असते . 
               जस जसे दिवस जवळ येत चालले तस तसे मनात कुठेतरी हुरहूर वाटायला लागली . हृदयात आपली मातृभूमी सोडून जाण्याचे अनामिक दुख: सुधा वाटायला लागले नातेवाईक व पारमार्थिक प्रेमी लोक सगळे भेटायला येऊ लागले आणि उगीचच भावनाशीलता होऊ लागली , डोळे भरून यायचे पुन्हा सगळ्यांच्या भेटी होतील का ? विमानाचे अपघात वगैरे ऐकत आलेलो असल्यामुळेहि असे काहीतरी उगीचच वाटायला लागले अर्थात हा मनाचा एक खेळच …" मन चिंती ते वैरी न चिंती " हे म्हणतात ते खरे आहे . 


क्रमश: 

ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,जंगल , समुद्र , प्राणी, पक्षी , लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.  

सोमवार, २ मे, २०१६

पूर्वतयारी -२

                                                    

          

                   गणेश पहिल्यांदा कोर्ससाठी म्हणून इंग्लंडला गेला तेव्हा त्याला पोहचवण्यासाठी मुंबईला विमानतळावर गेलो .  आयुष्यात प्रथमच विमानतळ बघितले ती भव्य इमारत आणि वेगवेगळ्या विमान  कंपनीच्या गेटवरची गर्दी . व प्रवाशांची लगबग , परदेशी प्रवाशी, पायलट व एयर होस्टेस यांची धावपळ बघितल्यावर टर्मिनलच्या आतमध्ये कसे असेल याची फक्त कल्पना करू शकत होतो . जेव्हा गणेश त्याची ब्याग घेऊन गेटवर गेला तेव्हा आम्हाला आत येऊ दिले नाही , सेक्युरिटीने आत जाता येणार नाही हे सांगितले . फार वाईट वाटले . आम्ही सर्वच त्याला निरोप देण्याकरिता तेथे होतो … डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते सौ अनुराधा तर अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होती . . आमच्या घरातील परदेशी जाणारा गणेश दुसरा होता. माझे वडील मराठा लाईट इनफंट्री मध्ये असतांना ते जपानला गेले होते त्यानंतर गणेश इंग्लंडला निघाला होता . आमच्यासाठी तो अविस्मरणीय क्षण होता . तो समोरच्या काचेमधून दिसत होता , इमिग्रेशनच्या टेबलजवळ होता तोपर्यंत दिसला नंतर पुढच्या क्षणी तो आणखी आत गेला मग फक्त फोनवर बोलणे झाले आणि तो विमानात बसला तेव्हा त्याचा एक फोन आला , मला फोनवर बोलताच  येईना गळा भरून आला डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळतच होते . हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही .
                 गणेश वारंवार परदेशी जातच होता मग मात्र काहीच वाटत नव्हते कारण ल्यापटॉपवर व्हिडीओवर बोलणे नेहमीच व्हायचे .मलेशियाला असतांना तो मला नेहमी म्हणायचा कि " आण्णा मी इथे आहे तोपर्यंत तुम्ही येउन जा " मी हो  म्हणालो, आणि पासपोर्टच्या तयारीला लागलो  तेव्हा मी पाटबंधारे खात्यामधे सरकारी सेवत होतो व् पस्पोर्टचा टेबल माझ्याकडेच होता  . मी लगेच तयारीला लागलो  . पासपोर्टसाठी लागणारे कागदपत्रे  , पासपोर्ट फोटो तेही  विशिष्ठ साइजमधेच , शाळा सोडल्याचा दाखला, नोकरीत असल्याचा दाखला , ऐसे सर्व कागदपत्रे एजेंटकड़े दिल आणि त्याने ते ऑनलाइन भरले , व् नंतर महिनाभरात पोलिस चौकशी वगैरे सोपस्कार पर पडले आणि फ़क्त माझा एकट्याचाच पासपोर्ट आला माझ्या पत्नीचा नहीं आला त्यामुळे मलेशियाला  जाता आले नाही  . तो पासपोर्ट दोन महिन्यांनी आला . पण तोपर्यंत आमचा मूड पण राहिला नव्हता .
                     मालेशियानंतर गणेश ऑस्ट्रेलियाला गेला आणि तेथे चांगला स्थिरावला व त्याचे पुन्हा सुरु झाले , " आण्णा आता मात्रा आई आणि तुम्ही इकडे आलेच पाहिजे . " तो मेलबर्न येथे राहत होता . आमचे पुन्हा परदेश वरची तयारी सुरु झाली . पासपोर्ट तर होतेच आता व्हिसा महत्वाचा होता त्यासाठी पुन्हा कागद पत्रे गोळा करणे आलेच . त्यातच माझी एप्रिल २०१३ मध्ये बायपास झालेली आणि नातेवाईक म्हणायचे " कशाला धाडस करता ? लांबचा पल्ला आहे विमानात १३-१४ बसायचे , तुम्हाला जमेल का ? " पण तुम्हाला सांगू का मी बायपास झाल्यानंतर मी वृंदावनाला सात दिवस भागवत साप्ताह केला तेव्हा तो प्रवास मला काहीही त्रासदायक वाटला नाही त्यानंतर द्वारकेला सुद्धा सात दिवस साप्ताह केला काहीही त्रास झाला नाही . त्यामुळे मला धाडस आलेले होतेच शिवाय भगवंतावर पूर्ण विश्वास . ……क्रमश:


ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.

पूर्वतयारी -१

                                                   
गणेश
          २५ वर्षापूर्वी माझ्या ऑफीसमध्ये एक काशीचा जोतिषी आला होता तो भविष्य सांगत होता . सर्वांचे भविष्य सांगून झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला " तुमचे भविष्य सांगू का ?" 
" नको सांगूस ! माझा विश्वास नाही भविष्यावर "
 "असू द्या साहेब ! ऐकून घ्यायला काय हरकत आहे का ? मी तुम्हाला खात्रीने सांगतो , तुम्हाला परदेश प्रवास घडणार आहे ."
"छे काहीतरीच काय सांगतो ? मी साधा कारकून माणूस आणि मी कशाचा परदेशी जातोय ? तू आपला मला खुश करण्यासाठी सांगत असशील तर ते मी समजू शकतो . "
नाही साहेब तुम्हाला माझ्या शब्दाची नंतर आठवण येईल . "
     मी आपले त्याचे ऐकून घेतले त्याला दहा रुपये दिले , जाऊद्या म्हटले लांबून आलेला माणूस आहेतो हि निघून गेला परत मला कधीही दिसला नाही . त्याचे भविष्य विसरूनही गेलो .
           मला तीन मुले आहेत त्यापैकी गणेश शिक्षणात जेमतेमच होता . पण स्वभावाने शांत आणि सेवाधारी . त्याचे कसे होईल अशी मला नेहमी चिंता असायची . एकदा आमचे घरी करवीरचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती तीर्थ स्वामी महाराज आले होते . गणेशने त्यांची खूप सेवा केली आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला " गणेश तुझे कल्याण होईल " मी म्हणालो स्वामी आता माझी चिंता मिटली . असो हा झाला श्रद्धेचा भाग प पू गुरुवर्य श्री चंपामाईचाहि आशीर्वाद होता . प्रयत्न आणि परिश्रम याची जोड जमली कि भाग्य बदलते . " भाग्याचेनी भडसे । उद्यामाचेनी मिसे । संपतीजात आपैसे । घर रिघे ।।" असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात . तसे काहीसे गणेशचे झाले . दहावीनंतर dairy science and husbandryचा  कोर्स केला आणि जनवराचा डॉक्टर म्हणून मोटार सायकलला निळ्या झाकणाचा थर्मास लावून आमच्या गावाच्या आसपासची गावे फिरून शेतकऱ्यांची जनावरे तपासणे , त्यांना उपचार करणे. हा उपक्रम दोन तीन वर्षे केला                    
                  आमचे जेष्ठ चिरंजीव  योगेश हा पुण्याला होता तो फर्ग्युसन महाविद्यालात एम ए (इंग्रजी) होऊन  फोटोग्राफी करत होता .,  त्याने गणेशाला पण पुण्याला पाठवावे असा आग्रह धरला . आमचा थोडा विरोध होता पण त्याने ऐकले नाही …. गणेशाला त्याने पुण्याला नेले आणि लोणावळ्याच्या  रेसाकोर्समध्ये नोकरीला लावून दिले आणि तेथून पुढे गणेशाने भयंकर संघर्ष , कष्ट केले आणि त्याचे फलित म्हणून कि काय तो इंग्लंड ,, फ्रांस , स्विझर्लंड , मलेशिया आणि शेवटी ऑस्ट्रेलिया पर्यंत फेरीयर म्हणून करियर केले आणि आता तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला आहे .  क्रमश: …


ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सदर करीन . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.