शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

मेलबर्न- गणेशच्या घरी

               मेलबर्न- गणेशच्या घरी







              
       मेलबर्न एअरपोर्टवर उतरलो , ते भव्य विमान तळ बघून जरा उर दडपल्यासारखे झाले ... आतमध्ये सगळे वातावरण थंड आणि उंच शरीर यष्टीचे पोलीस बघितले लगेच तेथील कडेकोट बंदोबस्त लक्षात आला. आम्हाला आता आमच्या ब्यागा ताब्यात घ्यायच्या होत्या .  आतमधून सर्व वळणावळणाचे रस्ते लक्षात येत नव्हते पण आम्ही एक केले ते म्हणजे आमच्या विमानात जे प्रवासी होते त्यात काही मुंबईहुन बसले होते त्यांच्या मागोमाग गेलो आणि तळमजल्यावर एका गोलाकार चक्रावर ब्यागा फिरत होत्या प्रत्येक बॅगेला एक ट्याग असतो त्यावर तुमचे नाव असते आमच्या बॅगा ओळखून पटकन उचलून घेतल्या आणि पुढे  जाण्यासाठी निघालो मला वाटले आता लगेच आपण बाहेर पडणार परंतु तसे इतके सोपे नव्हते. शिवाय बाहेर गणेश आला कि नाही हे अजून निश्चित झाले नव्हते .... नंतर गणेशाचा फोन आला तो म्हणाला मी बाहेरच उभा आहे काही काळजी करू नका . परत एकदा बॅगा तपासतील आणि मगच तुम्हाला बाहेर पडता येईल . आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो पुढेच एक महिला पोलीस आणि तिच्या हातात एका अल्सेशियन कुत्र्याचा बेल्ट , ते कुत्रे प्रत्येक प्रवाशाचा आणि त्याच्या बॅगेचा वास घेत होते. आमच्याजवळ काहीच संशयास्पद नव्हते तरीही एक अनामिक भीती वाटत होती . तेव्हढ्यात त्या कुत्रे आमच्या पुढील एका महिलेच्या जवळ जाऊन बसून राहिले लगेच त्या महिला  पोलिसाने त्या महिलेला बाजूला घेतले आणि तिची बॅग तपासली तर त्यात काही नव्हते फक्त दोन सफरचंद सापडले. तेव्ह्ड्यावरून त्या स्त्रीला त्यांनी धारेवर धरले , ती रडायला लागली आणि परोपरीने सांगत होती कि हे चुकून आले पाहिजे तर मी आटा फेकून देते, पण ते सेक्युरिटी काही ऐकेना त्यांचे म्हणणे असे कि आमच्या देशात अशा पद्धतीने दुसऱ्या देशातील फळे आणणे योग्य नाही कारण त्यातून सुद्धा प्रदूषण होऊ शकते . शेवटी २५०/- डॉलर दंड करून सोडून देण्यात आले . अगदी कडेकोट सुरक्षा आणि तपासणी एका दृष्टिने ते बरोबर आहे . ते बघितल्यावर आपल्याकडची ढिसाळ व्यवस्थापन आठवले.
          आम्ही त्या तपासणीतून सहीसलामत सुटलो आणि बाहेर पडलो ट्रॉलीवर बॅगा घेऊन रोडच्या गेटवर आलो पण गणेश कुठे दिसेना . ओळखीचे कोणी नाही , तेथील लोंकांचे इंग्रजी आम्हाला कळेना आणि आमचे त्यांना  .. परत गणेशाचा फोन आला मग जीवात  जीव आला तो म्हणाला तुम्ही आहे तिथेच उभे राहा मी बरोबर तिथेच येतो . गणेश आमच्याकडे आला आणि त्याने आमच्या हातातली ट्रॉली घेतली आणि रोड  क्रॉस करून पलीकडे गेलो तिथे गणेशाची गाडी उभी होती आणि तिथेच सौ नीता ( गणेशाची पत्नी, आमची स्नुषा ) उभी होती आणि कबीर तिच्या  कडेवर होता .  मला बघितले आणि कबिरने माझ्याकडे झेप घेतली  त्याचे निरागस हास्य आणि तो प्रेममय स्पर्श अश्रूंच्या रूपाने वाहू लागला. नातवाचा स्पर्श स्वर्गसुखापेक्षा अधिक असतो नंतर कबीर आज्जीकडे गेला त्याच्या प्रेमाने आज्जीला सुद्धा प्रेमाश्रू अनावर झाले आणि काहीही असले तरी आपण भारतीय आहोत हे सर्व असे झाल्याशिवाय मजा नाही .
           सर्व सामान डिकीत टाकले आणि आम्ही गणेशाच्या घरी निघालो सिटीमध्ये प्रवेश करतांना एक फ्लाय ओव्हर आहे त्यावर आम्ही चाललो होतो तेवढ्यात पाठीमागून एका कारने  आमच्या गाडीला धडक दिली आणि पाठमागच्या कारला  एका ट्रेलरने धडक दिली . मला तर असा राग आला गणेशाला मी म्हणालो मी उतरू काय खाली ? तो म्हणाला "अण्णा तुही उतरायची आवश्यकता नाही इथे सर्व समजदार लोक असतात. " गणेश खाली उताराला विशेष म्हणजे कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही मागच्या कारमध्ये ड्राइवर एक महिला होती तिने गणेशाची माफी मागितली व पाठीमागचा ट्रेलरचा ड्राइवर आला आणि सर्वांनी समजूतदारपणाने घेतले पोलिसाला फोन केला, इन्शुरन्स कंपनीला फोन केला व सर्व प्रक्रिया अर्ध्या तासात झाली . इन्शुरन्स कंपनीने गणेशाला एक दुसरी कर स्ट्यांड बाय म्हणून देण्याची तयारी दाखवली. त्याने तशी गरज नसल्याचे सांगितले. आणि आम्ही थोड्याच वेळात गणेशच्या घरी पोहचलो आणि छानपैकी शावरखाली गरम पाण्याने अंघोळ केली ..... आणि जेवण केले व थकवा सुद्धा खूप आला होता तेव्हा आमच्याकरिता असलेल्या रूममध्ये आरामासाठी प्रवेश केला.